-मुंबईतही 2 कोरोनाचे रुग्ण
-पुण्यात 8 रुग्णांचा समावेश
अर्थसंकल्पिय अधिवेशन संस्थगित करणार
मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) – देशासह राज्यालाही आता कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतही 2 करोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या 10वर पोहोचली आहे.
यामध्ये पुण्यातील 8 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. करोना विषाणूचे संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार येत्या शनिवारी किंवा रविवारी अधिवेशन संस्थगित केले जाईल. पुण्यात दुबईहून आलेल्या दाम्पत्यानंतर त्यांच्यासोबतच्या आणखी तिघांना करोनाचा संसर्ग झाल्याचे बुधवारी उघड झाले होते. त्यानंतर आज आणखी मुंबईतील दोन सहप्रवासीही बाधीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी संसदीय कामकाज सल्लागार समितीची तातडीची बैठक घेतली.
या बैठकीत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे कामकाज आटोपशीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुढील तीन ते चार दिवसांत अर्थसंकल्पावरील चर्चा, अर्थसंकल्पातील खातेनिहाय मागण्या आणि विनियोजन विधेयक मंजूर करून घेऊन अधिवेशन संस्थगित करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात कोरोना जे 10 रुग्ण आढळले आहेत हे सर्वजण दुबईला गेलेल्या त्या 40 जणांच्या ग्रुपमधील किंवा संबंधित आहेत. राज्यात इतरत्र याचा रूग्ण सापडलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या 40 जणांच्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांचा शोध घेण्यात आला आहे.
या 40 पैकी 4 जण कर्नाटकातील असून ते निगेटीव्ह आहेत.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सर्व आमदार तसेच प्रशासकीय यंत्रणा मुंबईतच गुंतून पडली आहे.
त्यांना प्रत्यक्ष फिल्ड किंवा त्यांच्या विभागात काम करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे विधानसभाध्यक्ष, सभापती, वरोधी पक्षनेते, गटनेते या सर्वांच्या बैठकीत येत्या शनिवारी किंवा रविवारी अधिवेशन संस्थगित करण्यावर एकमत झाले आहे.
मात्र हा निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाचा असल्याने गुरुारी दोन्ही सभागृहांत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ठाकरे म्हणाले. मात्र असे करताना कामकाज अर्धवट ठेवण्यात येणार नाही. आटोपशीर करून सर्व कामकाज येत्या तीन दिवसांत संपविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
अधिवेशनाच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळावी म्हणून गुरूवारपासून फक्त आमदार आणि अधिकाऱ्यांना विधानभवनात प्रवेश दिला जाणार आहे. अभ्यंगतांना प्रवेश दिला जाणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शाळांबाबत अद्याप निर्णय नाही
राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. इतरही परीक्षा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने असा निर्णय घेताना विचार करावा लागेल.
अद्वाप दोन दिवस सरकार वाट पाहणार आहे. आवश्यकता वाटली तर शाळा-कॉलेजनाही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. सध्या मुंबई,पुणे आणि नागपूर या ठिकाणीच तपासणीसाठीच्या प्रयोगशाळा आहेत. त्यांच्यात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी मागण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच सध्या ग्रामीण महाराष्ट्रात विविध देवांच्या यात्रा, मेळावे आदींचा हंगाम आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी होईल असे कोणतेही सण-सणवार किंवा यात्रा टाळाव्यात अशीच विनंती त्यांनी केली.
आयपीएलबाबत प्रस्ताव नाही
महाराष्ट्रात आयपीएलचे सामने होणार आहेत. आयोजकांनी प्रेक्षकांविना सामने आयोजित करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, त्यांच्याकडून अजून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर सरकार निर्णय घेईल, असे ठाकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.