ढाका :”जोय बांगला’ हे बांगलादेशाचे राष्ट्रीय घोषवाक्य ठरणार असे आदेश बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रीय दिवस आणि इतर योग्य प्रसंगी भाषणानंतर घटनात्मक पदे असलेले सर्व लोक आणि राज्याचे अधिकाऱ्यांनी “जोय बांगला’ असे म्हणावे, यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक ती पावले उचलण्यास हायकोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले.
शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रीकरणानंतर याच घोषवाक्याचा वापर करावा, असे निर्देशही कोर्टाने अधिकाऱ्यांना दिले. सरकारला तीन महिन्यांच्या आत या आदेशांच्या पालनाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासही सांगितले आहे.
1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात “जोय बांगला’ हा मुख्य नारा होता. बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांनीही आपल्या भाषणांमध्ये आणि विशेष म्हणजे 1971 च्या बांगलादेशाला स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय घोषित करत असलेल्या 7 मार्चच्या ऐतिहासिक भाषणात “जोय बांगला’ चा वापर केला होता.