दिब्रुगढ – बऱ्याच काळापासून सत्तेबाहेर राहीलेल्या कॉंग्रेस पक्षानेही आता आसामात सत्ता प्राप्त करण्यासाठी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांनी दाखवलेली वाट चोखाळली आहे. त्यांनी राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली असून त्यातील सगळ्यांत महत्वाचे म्हणजे पुन्हा सत्ता मिळाली तर मोफत वीज देण्याचे जाहीर केले आहे.
नागरिकांना दरमहा 200 युनीटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आणि महिलांनाही दरमहा 2 हजार रूपये गृहीणी सन्मान निधी दिला जाणार असल्याची घोषणा छत्तीसगढचे मुख्यमंत्री आणि आसाममध्ये कॉंग्रेसची कमान सांभाळणारे नेते भूपेश बघेल यांनी दिले आहे.
दरम्यान, आपल्या प्रचार अभियानात बघेल यांनी गुरूवारी भारतीय जनता पार्टीवर जोरदार तोफ डागत त्या पक्षाच्या सरकारची तुलना ब्रिटिशांच्या शासनाशी केली. या पक्षाने केवळ विभाजनकारी आणि स्वत:चे हित साधणारी धोरणे राबवली. आसाममधील शांतता आणि सदभावनेचे वातावरण भंग करण्याचाही भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
ब्रिटिशांप्रमाणेच भाषा, धर्म, वर्ण, खाण्यापिण्याच्या सवयी यांच्या आधारावर नागरिकांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे ते म्हणाले. देशात केवळ कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो लोकांना एकतेच्या बंधनात बांधून ठेवू शकतो. महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस अशा महान नेत्यांचा हा पक्ष आहे.
भाजपच्या कोणत्या कट कारस्थानाची आम्हाला भिती वाटत नाही असे नमूद करून घटनेने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. देशातील गरीब, सामान्य माणूस आणि राष्ट्रपतींच्या मतांत कोणताही फरक नसतो. त्यामुळे जनतेने विचारपूर्वक मतदान करावे. जर पुन्हा भाजप सत्तेवर आला तर ते पुन्हा तेच करतील जे आतापर्यंत करत आले आहेत, असे आवाहनही त्यांनी आसामच्या जनतेला केले.