औरंगाबाद – औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि कॉंग्रेस पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहे. कॉंग्रेसने औरंगाबाद शहराचे नामकरणास विरोध दर्शविला आहे. बाळासाहेब थोरात यांनी थेट विरोधात भूमिका मांडल्यामुळे शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस नवा वाद रंगण्याची चिन्हे आहे.
औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आला तर त्याला कॉंग्रेसचा विरोध असेल. किमान समान कार्यक्रमामध्ये नामांतरासारख्या बाबीचा समावेश नाही. अशा नामांतरामुळे सामान्यांचा विकास होतो असे मानत नाही.
केवळ नामांतरच नाही तर घटनेतील प्रास्ताविकेमध्ये दिलेल्या मूल्यांची प्रतारणा होईल अशा कोणत्याही कृतीस कॉंग्रेसचा विरोध असेल असे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी सांगितले. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकांची तयारीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी थोरात औरंगाबाद येथे आले होते.
भाजपाचे राजकारण मान्य नसलेल्या पक्षांचे आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आधारित काम करत आहे. एक पक्षाच्या सरकारमध्येही मतभेद असतात. हे तर तीन पक्षाचे सरकार आहे. मतभेद असले तरी त्यावर मात करुन किमान समान कार्यक्रम ठरविण्यात आले आहेत.
संभाजीनगर नामांतराचा विषय किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत. महाविकास आघाडीच्या प्रमुख म्हणून सोनिया गांधी यांना मार्गदर्शन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे कॉंग्रेसची ताकद कमी आहे हे खरे नाही. राज्यात नागपूर, नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेसला यश मिळाले. तसेच विधान परिषदेमध्येही यश मिळाले. मतभेद असले तरी किमान समान कार्यक्रमावर आधारित गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले असल्याचाही दावा त्यांनी केला.