मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. राज ठाकरेंच्या सभेनंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या वक्तव्यांचा समाचार देखील घेण्यात येत आहे. त्यातच राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश आहे. त्यांनी राज ठाकरेंच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे भाजपाची सी टीम असल्याचा उल्लेख केला. तसेच टाइमपास टोळीला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं असा सणसणीत टोला लगावला आहे. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार केला पाहिजे असेदेखील त्यांनी म्हटले आहे.
“आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे,” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेवर टीका केली आहे.
“भाजपाचं राजकारण पाहिलंत तर ज्या राज्यात सत्ता हवी आहे तिथे या दोन्ही पक्षांना वापरुन, एकमेकांविरोधात बोलून, काही घटना घडवून, हिंदू मुस्लिम दंगली घडवून सरकार स्थापन कसं करायचं याकडे लक्ष दिसत आहे,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. “जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं. कुठेही आपल्या राज्यात वाद वाढू नयेत, संवादानी पुढे जावं यासाठी महाराष्ट्राने लक्ष दिलं पाहिजे,” असा सल्ला आदित्य ठाकरेंनी दिला. तसंच हिंदुत्वासाठी सतत लढण्याची गरज नसते. राजकीय पक्ष म्हणून जी वचनं देतो ती पूर्ण करणंही हिंदुत्व आहे असेही उत्तर राज ठाकरेंना दिले आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या विषयी आदित्य ठाकरे यांनी, “अयोध्येतील संघर्ष संपला आहे. कोर्टाने निर्णय दिला आहे. शिवसेना अयोध्येला गेल्यानंतर कोर्टाचा निकाल आला आणि मंदिर उभं राहत आहे. मंदिर उभं राहिल्यानंतर दर्शनाला कोणीही जाऊ शकतं”, असे म्हटले आहे. “मुंबईकर गेली २५ वर्ष उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून सत्ता देत आले आहेत. महाराष्ट्राचा विकास कोविडच्या काळात कुठेच थांबला नाही. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेला मत दिलं जातं. उद्धव ठाकरे आणि आमचं काम पालिका निवडणुकीतील चेहरा असेल,” असेही ते म्हणाले.