सातारा – दुष्काळग्रस्तांच्या मुळावर उठलेल्या बारामती, फलटण आणि लोधवडेकरांसारख्या नतद्रष्टांमुळे माजी मंत्री जयंत पाटील यांनीच जिहे कठापूरच्या वाढीव कामाचे टेंडर रखडवले होते. मात्र, त्याच जयंत पाटील यांनी माझ्यावर असभ्य टीका केली. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इस्लामपुरात स्टेज टाकून माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी दिले. माजी आयुक्त असणाऱ्या अधिकाऱ्याला प्रस्ताव आणि मंजुरीतील फरक कळत नाही हे दुर्दैवी असल्याचा टोलाही त्यांनी प्रभाकर देशमुखांना लगावला.
आ. जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथे बोलताना माजी मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. पवार, रामराजे आणि लोधवडेकरांनी त्यांची सत्ता असताना अडीच वर्षात मतदारसंघात एक रुपयाचे काम आणले नाही. त्यांनी जयंत पाटलांना आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाचे टेंडर काढू दिले नाही. बारामती, फलटणकरांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता.
माणमधील नतद्रष्ट औलादी त्यांना टेंडर काढू नका म्हणून सांगत होत्या. जिहे कठापूरच्या कामाचे टेंडर काढावे या मागणीसाठी आम्ही अधिवेशनात सभागृह बंद पाडले होते. त्यावेळी जयंत पाटलांनी एक महिन्यात टेंडर काढतो असे सांगितले होते. तेव्हा काढलेले टेंडर त्यांनी रद्द केले. त्यांच्या त्या निर्णयामुळे ही योजना अडीच वर्षे रखडली.” मला श्रेय मिळेल म्हणून त्यांनी दुष्काळी जनतेला वाऱ्यावर सोडले, ही वस्तुस्थिती असताना दहिवडीतील सभेत त्यांनी असभ्य भाषेत माझ्यावर टीका केली असे सांगत त्यांनी हे उत्तर देण्याचे आव्हान दिले.
मागच्या वेळी 22 जण एकत्र आले म्हणून लढाई तरी झाली होती. आता तर “ठरलय’वाले पांगले आहेत, असे सांगून श्री. गोरे यांनी आयुक्त पदावर काम केलेल्या देशमुखांना पाणी फेरवाटपाचा प्रस्ताव आणि मंजुरी यातील फरक कळत नाही हे दुर्दैवी आहे, अशी टीका केली. याच लबाडांनी म्हसवड परिसरातील एमआयडीसीलाही विरोध केला होता. पण त्यांचे आव्हान स वीकारुन त्यांच्याच छाताडावर बसून आम्ही एमआयडीसी मंजूर करुन आणली असल्याचेही त्यांनी सांगितले.
बारामती सत्तेत नसली की आरक्षणासाठी आंदोलने
मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिले होते. महाविकास आघाडीने ते घालवले. आता बारामती सत्तेत नाही, त्यामुळे आंदोलने सुरु झाली आहेत. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असे पवार यांनी अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारने हा विषय कधी घेतला नाही. त्यांच्या कार्यकाळात कुणी आरक्षण मागितले नाही. मराठा समाजाला आमचेच सरकार आरक्षण देणार आहे. धनगर समाजासाठी आमच्या सरकारने हजारो कोटींची तरतूद केली आहे. त्यांच्या आरक्षणाचा विषयही आम्हीच मार्गी लावणार आहोत, असेही आ. गोरे यांनी सांगितले.