कोथरूड – पौड रस्त्यावरील शिवतीर्थ नगर समोरील रस्ता म्हणजे डोंगरमाथ्यावरील रस्ता झाल्याचा भास वाहन चालकांना होऊ लागला आहे. धक्कादायक म्हणजे महिनाभरापूर्वी पावसाची विश्रांती घेतलेली असतानाही या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून दुरूस्तीच्या कामाला “उरकण्यात’ आले. पावसात सर्व डांबर वाहून गेले आहे.
पौड रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून परिसरातील अंतर्गत रस्तेही खड्डेमय झाले आहेत. हे खड्डे जून-जुलैच्या पावसातच पडले होते. त्यानंतर पावसाने दडी मारली आणि तशी महापालिका प्रशासनानेही दडी मारली आणि खड्डे भरलेच नाही. वारंवार मागण्या केल्यावर महिन्याभराने प्रशासनाने खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरवात झाली. मात्र, हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज दिल्यावर प्रशासनाने घाईघाईने डांबरीकरण करून खड्डे भरले. परंतु, सुरवातीच्या दोन पावसातच डांबर निघाले आणि सर्व खड्डी रस्त्यावर पसरली.
जयभवानीनगरकडून आनंदनगरकडे जाताना शिवतीर्थनगर येथील रस्त्यावर एवढे खड्डे पडले आहेत की आपण नक्की डोंगरी भागात आहोत की शहरात, अशी स्थिती रस्त्यांची आहे. गुजरात कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी रस्त्यावर डांबर टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, पाऊस झाला आणि सर्व रस्ता खराब झाला. याबाबत प्रशासनाला निवेदन दिले. मात्र यावर अद्याप कारवाई झालेली नाही, असे स्थानिक रहिवाशी गिरीश गुरनानी यांनी सांगितले.
प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असून दुरूस्तीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लुट होत आहे. या खड्डयांमुळे नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागले. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाले त्यांच्यावर कारवाई करून तात्काळ सर्व खड्डे भरून रस्ता सुरक्षित करावा. – हर्षवर्धन दीपक मानकर, अध्यक्ष, कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस