नितीन शेळके
संगमनेर – गेल्या सात टर्मपासून आमदार असलेल्या आणि सध्या कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघावर आपली निर्विवाद पकड ठेवली आहे. या सात टर्मदरम्यान त्यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांसोबतच पाच महिलांनीदेखील विरोधात लढत दिली. मात्र तत्कालीन कॉंग्रेसच्या उमेदवार शकुंतला थोरात यांचा अपवाद वगळता एकही महिला त्यांना काट्याची टक्कर देऊ शकली नाही. सर्वांना आपली अनामतदेखील गमवावी लागली.
तत्कालीन आमदार व कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री बी. जे. खताळ पाटील यांनी 1985 नंतर आपण कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट करत 1985 ची सार्वत्रिक विधानसभा निवडणूक लढविण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. तत्पूर्वी 1978 ते 80 या तीन वर्षांच्या काळात आमदार असलेल्या भाऊसाहेब थोरात यांनी देखील निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने कॉंग्रेसला या मतदारसंघात उमेदवार शोधण्याची वेळ आली. पक्षाने त्यावेळी आंबेगाव (पुणे) येथील शकुंतला थोरात या महिलेला उमेदवारी दिली.
उमेदवार पक्षाने लादल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आणि त्यांनी भाऊसाहेब थोरात यांचे पुत्र बाळासाहेब थोरात यांना अपक्ष उमेदवारी करण्यास भाग पाडले. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शकुंतला थोरात यांचा 10 हजार 159 मतांनी पराभव केला. तेव्हापासून थोरात या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
शकुंतला थोरात या एकमेव कॉंग्रेस उमेदवाराचा अपवाद वगळता नंतरच्या 1990 च्या निवडणुकीत प्रा. आशा भांगरे यांनी अपक्ष उमेदवारी केली. त्यानंतर मात्र थेट 2009 च्या निवडणुकीमध्ये ऍड. निशाताई शिवूरकर यांनी समाजवादी जन परिषदेतर्फे व सुमन पांडे यांनी अपक्ष म्हणून नशीब अजमावले. त्यावेळीदेखील थोरात 55 हजार 376 मतांनी विजयी झाले होते. गत 2014 च्या निवडणुकीमध्ये सुनीता बेल्हेकर यांनी देखील अपक्ष उभे राहत आपले नशीब अजमावले. मात्र त्यांनादेखील अपयश आले.