मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या अपक्ष उमेदवारीवरून राजकारण सुरु झाले आहे. छत्रपतींचे वडील श्रीमंत शाहू महाराज यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे आता संभाजीराजे आणि शाहू महाराज यांच्यातच मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी या सर्व प्रकरणावर “शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत त्यामुळे त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले असले तरी त्या संदर्भात मी बोलणार नाही. त्या संदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टपणे ट्विट करुन सांगितले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो मी जे बोललो ते सत्य बोललो. मला असं वाटतं की प्रतिक्रिया बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचे दुःख आहे की काही किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना समजत नाही की अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवतं आहेत. दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजेंमध्ये काहीतरी अंतर आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम करणाऱ्यांबद्दल मला प्रचंड दुःख आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस “युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते आणि सध्या ही होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचा कुठलाही नुकसान भाजपाला नाही. त्याचे नुकसान कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे ज्याला कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते,” असेही म्हणाले.
“आभार मानन्यापूर्वीच मला संभाजीराजे छत्रपती भेटले होते त्यापूर्वीच त्यांनी मी कुठल्याही पक्षाचे तिकिट न घेता स्वतंत्र निवडणुकीला उभा राहणार असल्याची घोषणा केली होती. माझी अपेक्षा आहे की घराण्याची परंपरा पाहता मागच्या वेळी राष्ट्रपती कोट्यातून भाजपाने आम्हाला समर्थन देऊन त्या पदावर बसवले तसेच सगळ्या पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिले पाहिजे. सगळे समर्थन देणार असतील मी जरुर हायकमांड सोबत चर्चा करेन असे आश्वासन दिले होते. काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील,” असे फडणवीस म्हणाले.