मंचर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाला राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळवून द्यावा, या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मता दाखवली आहे, अशी माहिती स्वराज्य संघाचे अध्यक्ष हभप बाजीराव महाराज बांगर यांनी दिली.
स्वराज्य संघाच्या वतीने छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती शंभूराजांचा देदीप्यमान इतिहासाचा वसा व वारसा जतन व्हावा या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई भेटीत निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष हभप माणिकमहाराज मोरे, राज्यउपाध्यक्ष बाबासाहेब दिघे, पुणे जिल्हाध्यक्ष माऊली कुंजीर, आध्यात्मिक आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोडके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रादयाचे भूषण असलेले वीणा, पगडी, चिपळ्या, उपरणे आणि हार घालून सन्मानित करून त्यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळून द्यावा आणि शिवजयंती शाळा- महाविद्यालयांत, तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी. छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभुराजे यांचा देदीप्यमान इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.
श्रीक्षेत्र वढू व श्रीक्षेत्र तुळापूरला विशेष तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून द्यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले, अशी माहिती स्वराज्य संघ सचिव शामकांत निघोट व राजेश कान्हूरकर यांनी दिली.