मोशी, दि. 14 (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड शहरात प्राधिकरणाचे ठिकठिकाणी मोकळे भूखंड आहेत. परंतु प्राधिकरणाच्या या भूखंडांवर शहरातील नागरिक, उद्योजक तसेच व्यावसायिक आपल्या येथील राडारोडा टाकण्यासाठी उपयोग करत आहेत. हा सर्व प्रकार रात्रीस चालत असल्याने शहरातील मोकळे भूखंड नेमके कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
मोशी प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर परिसरातील नागरिक तसेच व्यावसायिक व उद्योजक अनावश्यक कचरा व राडारोडा भूखंडावर आणून टाकत आहेत. पुणे-नाशिक महामार्गालगत मोशी, आदर्श नगर परिसरात प्राधिकरणाचा मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर रबर, प्लॅस्टिक व फायबर कचरा अवैधरित्या टाकला जात आहे. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच कचरा टाकून नागरिक गप्प बसत नाहीत. तर या कचऱ्यातील प्लॅस्टिक, वायर, रबर आदी वस्तू जाळून टाकल्या जात आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या मोकळ्या भूखंडावर राडारोडा, कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कोणाची मिलीभगत?
महामार्गालगत कचरा टाकून जाळण्याचे प्रकार मागील वर्षापासून बिनधिक्ततपणे सुरू आहे. त्यावर प्रशासन काहीच कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. हा सर्व प्रकार कोणाच्या आश्रयाखाली सुरू आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. यामागे अर्थपूर्ण मिलीभगत असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू असल्याचे समजते. दरम्यान याच ठिकाणी अवघ्या पाचशे मीटर वर शहराचा कचरा डेपो असताना त्यात कचरा टाकण्यापेक्षा जाळण्याचा त्रास का व कशासाठी घेतला जात आहे की यामागे काही वेगळे कारण आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आधीच जनता दुर्गंधीने त्रस्त
मोशी गावातील नागरिक मुळातच महापालिकेच्या कचरा डेपोने आणि त्याच्या दुर्गंधीने त्रस्त आहेत. त्यात भर म्हणजे प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर कचरा जाळून दुर्गंधी पसरविली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होत आहे. प्रशासनाच्या संबंधित विभागाने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
मोशी प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर टाकलेला कचरा तसेच प्लॅस्टिक, रबर पेटवून दिले जात आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर व वायूप्रदूषण घडत आहे. परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले तसेच धम्याचा आजार असणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन होत नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
“एमआयडीसी’तील कंपन्या टाकतात कचरा
भोसरी “एमआयडीसी’तील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये फायबर, रबर, प्लॅस्टिक वस्तू बनविताना त्यातून निघणारा वेस्टेज कचरा रात्रीच्या वेळी प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागे लगतच्या नाल्यात, ओढ्याभोवती तसेच महामार्गालगत भूखंडावर टाकला जात आहे. तो पसरू नये याकरिता त्याला पेटवून दिले जात असून, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. मोकळ्या भूखंडाचा खासगी कंपनींकडून कचरा टाकण्यासाठी वापर होत असल्याचे निदर्शनात येत आहे.