पुणे, दि. 14 – दिवाळीमुळे डाळींना मागणी वाढली आहे. त्यातच अतिवृष्टीचा फटका बसल्याने डाळवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, उत्पादनात दरवर्षीच्या तुलनेत तब्बल 20 ते 30 टक्के घट झाली. त्यातच मागील वर्षीची शिल्लक डाळ कमी आहे. साठेबाजही सक्रीय झाले आहेत. परिणामी, गेल्या तीन आठवड्यांत सर्वच डाळींच्या भावात लक्षणीय वाढ झाली असून, सामान्य नागरिकांना मात्र महागाईचा “बोनस” सहन करावा लागत आहे. सध्या घाऊक बाजारात तूरडाळ-किलोमागे 10 ते 15, उडीद डाळीच्या भावात 5 ते 10, हरभरा आणि मूगडाळीचे भावात 5 ते 7 आणि मसुरच्या भावात 2 ते 4 रुपये वाढ झाली आहे. दरवर्षी सण-उत्सव काळात पुरणपोळी, लाडूसाठी हरभरा डाळीला मागणी जास्त असते. दिवाळीत बेसन लाडू, शेव, पापडी व इतर पदार्थ बनविण्यासाठी हरभरा डाळीला जादा मागणी असते.
अतिपावसाचा तडाखा
दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर तूरडाळीचे पीक बहरते. मात्र, यंदा अतिपावसामुळे पीक खराब झाले आहे. तुरीच्या शेंगांची वाढही हवी तशी झालेली नाही. काही ठिकाणी पीक जळाले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. परिणामी, भाव तेजीत आहेत.
दिवाळीमुळे डाळींना मागणी वाढली आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान झाले आहे. जुना शिल्लक माल कमी आहे, नवीन येणारा माल उशिराने येणार येणार आहे. या सर्व कारणांमुळे डाळींचे भाव तेजीत असून, मागील काही दिवसांत डाळींच्या भावात वाढ झाली आहे. – नितीन नहार, डाळींचे व्यापारी, मार्केट यार्ड