मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेले असले, तरी देखील या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवाय, राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आले आहे. तर, मागील २० दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भाजप-मनसे युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर असेही सांगितले जात आहे की, भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण व स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका मात्र भाजपाला मान्य नाही. मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे शक्यता दिसत आहे.
Mumbai | Maharashtra BJP President, Chandrakant Patil arrives at the residence of Maharashtra Navnirman Sena Chief, Raj Thackeray pic.twitter.com/gPA4GMTa0U
— ANI (@ANI) August 6, 2021
तर, भाजपा आणि मनसेची युती होण्याची शक्यता नाहीय. यामागील मुख्य कारण म्हणजे मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार आम्हाला मान्य नाहीत. मात्र मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणं महत्वाचं असतं म्हणून मी राज ठाकरेंची भेट घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे.
तसेच, परप्रांतीयाबाबतच्या राज ठाकरेंच्या भाषणाची क्लिप मला मिळाली आहे. ते भाषण मी ऐकले असून त्याबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत. त्यावर येत्या दोन दिवसांत राज ठाकरे यांची भेट घेऊन मी चर्चा करणार आहे. पण आमच्यात युतीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नाही असं भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होत. युतीबाबत केंद्रातील आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिकाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली होती.