आमदार फूटू नये म्हणून सर्व आमदारांना अज्ञातस्थळी ठेवणार
मुंबई : राज्यातील सत्तास्थापणेच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शिवसेना आपल्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे. सेना आपला एकही आमदार फूटू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या रात्री म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी सध्याची विधानसभा विसर्जित होणार आहे. त्या अगोदर राज्यातील बहूमत मिळालेल्या पक्षाने सरकार स्थापण करून मंत्रीपदाची शपथ घेणे गरजेचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर सेनेकडून हे पाऊल उचण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार आणि चंदक्रात पाटील यांच्यासह काही प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. तसेच भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने आजच पक्षाकडून सत्तास्थापणेचा दावा करण्यात येणार असल्याचे भाकित वर्तवण्यात येत आहे. भाजपला सत्तास्थापण करण्यासाठी 145 आमदारांचे पाठबळ असणे आवश्यक आहे तसेच सध्याच्या घडीला भाजपकडे 115 ते 117 आमदारांचे पाठबळ आहे त्यामुळे भाजपकडून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी भिती सेनेला असल्याने आपल्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपकडून आजपर्यंत सर्वच पक्षाच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच केला होता. तसेच त्यासाठी भाजपने धमक्या, गुंडाचादेखील वापर केल्याचे त्यांनी म्हटले होते म्हणूनच शिवसेनेने सध्या सावध पवित्रा घेतला असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, काल भाजपकडून सत्तास्थापणेचा तिढा सोडवण्यासाठी कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत महत्वपूर्ण निर्णयदेखील घेण्यात आले होते त्यातीलच एक महत्वाचा निर्णय म्हणजे आजची राज्यपालांसोबतची बैठक. त्यामुळे सेनेकडून आपल्या आमदारांना फूटण्यापासून वाचवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागत असल्याचे म्हटले जात आहे.