इंदूर – पहिल्या डावात ज्या पद्धतीने फलंदाजी करणे गरजेचे होते तशी करता आली नाही. या डावात किमान दोनशे धावा केल्या असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा दिसला असता, अशा शब्दात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पराभवानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाजीचा मारा चांगला होता. मात्र, आम्हीच जबाबदारीने फलंदाजी करण्यात कमी पडलो, असेही त्याने सांगितले.
या सामन्यासाठी जी खेळपट्टी दिली गेली होती, त्यात काहीही गैर नव्हते त्यामुळे पहिल्या सामन्यापासूनच जी खेळपट्ट्यांवर सातत्याने टीका होत आहे ती निरर्थक आहे. या खेळापट्टीवर आम्ही संयमी फलंदाजी केली असती तर जास्त धावा करू शकलो असतो. मात्र, तसेच घडले नाही. त्याचरोबर ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला आणि त्यांच्या गोलंदाजीसमोर आम्ही अनावश्यक फटके मारले. अशी हार जीत कोणत्याही सामन्यात पाहायला मिळते त्यामुळे त्याची आम्ही चिंता करत नाही उलट आता अहमदाबादला होत असलेल्या चौथ्या कसोटीत जास्त सकारात्मकतेने खेळू, असेही रोहित म्हणाला.
ऑस्ट्रेलियाने आम्हाला पहिल्या डावात कमी धावसंख्येत रोखले व त्यांनी पहिल्या डावात चांगली फलंदाजी करत 80 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली होती. त्यावेळी आम्ही दुसऱ्या डावात जास्त जबाबदारीने फलंदाजी करणे गरजेचे होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर आम्ही किमान 170-180 धावांचे आव्हान ठेवू शकलो असतो तर आम्हाला हा सामनाही जिंकण्याची निश्चितच संधी होती. विजयासाठी 76 धावा हे खूपच सोपे लक्ष्य ठरले, असेही ते म्हणाला.
#INDvAUS 3rd Test : तिसरी कसोटी अडीच दिवसांत निकाली! भारताचा दारुण पराभव
रणनिती चुकली
ऑस्ट्रेलियाच्या नाथन लियॉनने अफलातून गोलंदाजी केली. आम्ही अपयशी ठरलो असे सांगून मला त्याचे श्रेय काढून घ्यायचे नाही. मात्र, तो सातत्याने एकाच टप्प्यावर चेंडू टाकत असताना त्यानुसार रणनिती आखण्यात आम्हाला अपयश आले, हे मात्र कबुल करावे लागेल, असेही रोहित म्हणाला.