मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त आज विधानसभेत आज भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातळखर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवण्यात यावे, असा अजब सल्ला सरकारला दिला आहे.
भटक्या कुत्र्यांबाबत सुरु असलेल्या लक्षवेधीवर बोलताना कडू यांनी म्हटले, खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा.
ते जमत नसेल तर रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर तिथे कळले, जसे आपल्याकडे बोकडाचे मांस खाल्ले जाते. तसे, तिकडे कुत्र्यांचे मांस खाल्ले जाते, असे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.