गुवाहाटी – भारतीय जनता पक्षाने ईशान्येकडील राज्यांमध्ये पुर्ण यश मिळवल्याचा दावा केला असला तरी तो खरा नाही,या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनीच वर्चस्व राखले आहे असे आसाम राष्ट्रीय परिेदेचे नेते जगदीश भुयान यांनी म्हटले आहे. भाजपने मोठ्या यशाचा दावा केला असला तरी त्यांचे मेघालय, नागालॅंड अस्तित्व नगण्य आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. ईशान्येकडील राजकीय शक्ती अजूनही मेघालय आणि नागालॅंड या राज्यांतील प्रादेशिक पक्षांकडेच आहे, असे त्यांनी पीटीआयला सांगितले.
गेल्या महिन्यात विधानसभा निवडणूक झालेल्या त्रिपुरामध्ये भाजपची संख्या 36 वरून 32 आणि त्यांच्या मित्रपक्षांची संख्या आठ वरून एक झाली आहे, असे ते म्हणाले. दुसरीकडे, या राज्यातील निवडणुकीत पहिल्यांदाच लढलेल्या टिपरा मोथाने 13 जागा मिळवल्या आहेत असे ते म्हणाले.
नागालॅंडमध्ये, भाजपने 20 जागांवर निवडणूक लढवली परंतु केवळ 12 जागा जिंकल्या. पण एनडीपीपी पक्षाला या निवडणुकीत 25 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात या भाजपचा नव्हे तर एनडीपीपीचाच खरा प्रभाव आहे, असेही ते म्हणाले.
भुयान म्हणाले की, मेघालयमध्ये भाजपने कॉनरॅड संगमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावत निवडणुकीपूर्वी सत्ताधारी एनपीपीशी आपली युती तोडली होती. आणि भाजपला या निवडणुकीत केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की ईशान्येकडील भाजपच्या लोकप्रियतेच्या आणि सत्तेच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर इथली खरी सत्ता नेहमीच प्रादेशिक राजकीय पक्षांकडे राहिली आहे, असे ते म्हणाले.