मुंबई : करोनाची दुसरी लाट सध्या ओसरल्याचे चित्र आहे. बाधितांचा आकडा कमी झाला आहे. त्यामुले राज्य सरकारनं काही जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. तर ११ जिल्ह्यांत मात्र, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवले आहेत. मुंबईत निर्बंध शिथिल झाले असले तरी मुंबईची लोकल सेवा आणखीनही बंदच आहेत. याच मुद्दयावरून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना लोकल प्रवासवरील बंदी कायम ठेवल्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले,” लोकल रेल्वे प्रवासाला मुभा देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटलेलं नाही. त्यांनी हा निर्णय तूर्तास स्थगित केलेला आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीनं मागणी होत आहे. मागण्या होत आहेत, पण होणारे परिणामही मुख्यमंत्र्यांनाच बघावे लागतात”, असेही टोपे म्हणाले.
“दोन डोस घेतलेल्यांचं प्रमाणपत्र तपासून प्रवेश देणं. मोठ्या संख्येनं लोक लोकल रेल्वेतून प्रवास करतात, मग हे शक्य होईल का? ते कशापद्धतीने तपासता येईल? या सगळ्या बाबी आहेत. यात घाईगडबड करणं शक्य नसतं. घाईत असं केलं गेलं, तर करोनाच्या दृष्टिकोनातून याचे दुष्परिणाम खूप मोठे होऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटलेलं नाही. निर्णय स्थगित केलेला आहे. संबंधित सर्व लोकांशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेतीलच”, असे टोपे यांनी सांगितले.
“मंदिर खुलं करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जे निर्बंध होते, ते निर्बंध कायम आहेत. थोडी प्रतीक्षा करूया. या संदर्भातील निर्णयही मुख्यमंत्री घेतील”, असं राजेश टोपे म्हणाले.