संतोष पवार
-जिल्ह्याची वाढतेय चिंता
-चार तालुक्यांत अधिक बाधित आणि मृत्यू
-महाबळेश्वर तालुक्यात कमी प्रादुर्भाव
सातारा – जिल्ह्यात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव वाढता असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. सातारा तालुक्यात सर्वाधिक बाधित आणि मृत्यूची नोंद असून कराड तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. फलटण तालुका तिसऱ्या आणि खटाव तालुका चौथ्या क्रमांकावर आहे. या चार तालुक्यांतील वाढते बाधित आणि वाढते मृत्यू जिल्ह्याची चिंता वाढवत आहेत. महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी बाधित आणि मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात मार्च 2020 पासून करोनाचा प्रादुर्भाव असून या 16 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात दोन लाख 20 हजार 328 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील पाच हजार 327 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सातारा तालुक्यात 45 हजार 572 बाधित आढळले असून एक हजार 336 जणांचा मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यात 35 हजार 408 बाधित आढळले असून एक हजार 37 मृत्यू, फलटण तालुक्यात 31 हजार 112 बाधित आढळले असून 532 जणांचा मृत्यू, खटाव तालुक्यात 21 हजार 805 बाधित आढळले असून 519 जणाचा मृत्यू झाला आहे.
कोरेगाव तालुक्यात 19 हजार 162 बाधित झाले आणि 411 जणांचा मृत्यू झाला आहे. माण तालुक्यात 14 हजार 915 बाधित आणि 303 मृत्यू, वाई तालुक्यात 14 हजार 395 बाधित आणि 328 मृत्यू, खंडाळा तालुक्यात 13 हजार 158 बाधित आणि 167 मृत्यू, जावळी तालुक्यात नऊ हजार 385 बाधित आणि 200 जणांचा मृत्यू, पाटण तालुक्यात नऊ हजार 589 बाधित आणि 334 मृत्यू, तर महाबळेश्वर तालुक्यात चार हजार 529 बाधित आढळले असून 87 जणांचा मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यात करोनाबाधित आणि मृत्यूची संख्या कमी आहे. जिल्ह्याबाहेरील एक हजार 658 बाधित आढळले असून 73 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात काही तालुक्यात बाधित आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असून आरोग्य विभागाने मृत्यूदर कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. सध्या लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. आगामी काळात लसीकरणाची मोहीम आणखी गतीने राबवण्यात येणार आहे. बाधित आणि मृत्यूची संख्या काही दिवसात नियंत्रणात येईल.
विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी,सातारा