वसई – ऑक्सिजनच्या अभावी ७ रुग्ण दगावल्याचा ठपका असलेलेच रुग्णालय सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून ठरले आहेे. विशेष म्हणजे या रुग्णालयाचा सन्मान राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. नालासोपारा येथील विनायका रुग्णालय असून ऑक्सीजनच्या अभावी ७ रुग्ण दगावल्याचा ठपका या रुग्णालयावर आहे.
एका खासगी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हा सन्मान रुग्णालयाला देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून पुरस्कार मागे घ्यावा आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नालासोपारा येथील विनायका रुग्णालयात करोनाकाळात रुग्णाकडून अवाजवी देयक आकारणीच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या तसेच १२ एप्रिल रोजी याच रुग्णालयात ७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यावेळी रुग्णांच्या नातेवाकांनी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णालयावर केला होता.
दरम्यान, याच रुग्णालयाला आता राज्याचे राज्यपाल आणि आरोग्य मंत्री सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून गौरव करताता ही गंभीर बाब आहे. ७ रुग्णांच्या मृ्त्यूला हे रुग्णालय जबाबदार आहे. मग अशा रुग्णालयाला पुरस्कार कसा दिला गेला, असा सवाल भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष मनोज बारोट यांनी केला आहे.