मुंबई : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एमआयएम) पक्षाच्या दोन दिवसीय पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला नवी मुंबईत प्रारंभ झाला. या अधिवेशन दरम्यान, मुस्लिमांमधील पसमांदा मुस्लीम समाजाला जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी भाजपचे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातील धोरण लक्षात घेता मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न कदापीही यशस्वी होणार नाही, असा दावा एमआयएमचे प्रमुख असुदुद्दिन ओवैसी यांनी केला आहे.
या अधिवेशनात आगामी काळात एमआयएम हा राष्ट्रीय पातळीवर प्रभावी पक्ष म्हणून ताकद निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला विरोध कायम राहणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले. पहिल्या दिवशी विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांनी त्या त्या राज्यांमधील राजकीय परिस्थितीची माहिती दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमची राष्ट्रीय पातळीवर बांधणी करण्यात येणार आहे. आगामी काळात जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडून आणण्याची योजना ओवेसी यांनी जाहीर केली. उद्या, रविवारी दुसऱ्या दिवशी राजकीय ठराव तसेच आगामी काळातील पक्षाचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे.
मुस्लीम समाजातील कनिष्ठ वर्ग म्हणून मानल्या जाणाऱ्या पसमांदा समाजाला जवळ करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात मांडली होती. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे ओवैसी यांनी पसमांदा समाजाचा पाठिंबा मिळेल हे गृहित धरू नका, असा इशारा भाजपला दिला.