कराड – गेली चार टर्म आमदारकीवर अधिराज्य करणाऱ्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात आमदार बाळासाहेब पाटील यांनी विजयाचा पंचक केले. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद साजरा केला.
आमदार बाळासाहेब पाटील यांना मतदारांनी भरभरून प्रेम देत 99899 एवढे विक्रमी मतदान दिले. तर भाजपचे बंडखोर उमेदवार मनोज घोरपडे यांनी 51 हजार 43 एवढी मते घेत दुसऱ्या नंबरवर राहिले तर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम हे तीन नंबरला फेकले गेले. त्यांना 39 हजार एवढी मते मिळाली. या तीन उमेदवारांमध्ये जनतेने प्रचंड प्रेम घेत आ. बाळासाहेब पाटील हे 48856 मताधिक्यांनी विजयी झाले.
सकाळी आठ वाजता सातारा येथील वखार महामंडळात मतमोजणी सुरुवात झाली. ही मतमोजणी 33 फेऱ्यांमध्ये पार पडली. सुरुवातीला आमदार बाळासाहेब पाटील हे आघाडीवर होते. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे बंडखोर उमेदवार मनोज घोरपडे यांनी मताधिक्य घेत बाळासाहेबांवर अवघे नऊ मतांचे लीड घेतले. त्यानंतर अन्य फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील हे मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांना वरचढ ठरत गेले. शेवटी बाळासाहेब पाटील यांनी 48 हजारावर मताधिक्य घेत बाजी मारली. दुसरा नंबरवर मनोज घोरपडे राहिले, तर धैर्यशील कदम तीन नंबरला फेकले गेले.
कराड उत्तर मतदारसंघांमध्ये कोणाचा विजय होणार याचे महिन्याभरापासून अंदाज बांधले जात होते. यात भाजपचे बंडखोर उमेदवार मनोज घोरपडे यांचे तिकीट कापून ते धैर्यशील कदम यांना देण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या घोरपडे यांनी बंडखोरी केली. आणि तिरंगी लढतीत पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब पाटील हेच सरस ठरले.
कराड उत्तरेत तिरंगी लढतीचे निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. तरीही गाफील न रहाता बाळासाहेब पाटील व सहकाऱ्यांनी संपूर्ण कार्यक्षेत्र पिंजून काढले होते. तरुणाईच्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेबांना यशाला गवसणी घालता आली. शिवाय कार्यकर्त्यांनी गाववार नियोजन करुन त्याचा केलेला पाठपुरावा पथ्यावर पडला. एकंदरीत काळजाची धडधड वाढविणारा निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेसला सकारात्मक ठरला आहे.