जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व शासकीय कार्यालयांना आदेश
पालिका अधिकाऱ्यांनाही प्रशासनाच्या सूचना
पुणे – शहरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्याने सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना तसेच विभाग प्रमुखांना शहर सोडण्यास मनाई केली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. दरम्यान, महापालिकेनेही आपल्या सर्व अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या असून शनिवार आणि रविवारीही पुण्यात थांबण्यासह 24 तांस अत्यावश्यक कामांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
करोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही या आजाराला जागतिक महामारी म्हणून घोषीत केले आहे. या साथीला अटकाव करण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
तसेच, या साथीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी राम यांनी पुणे जिल्ह्यात पुणे केंद्रीय आपत्ती व्यस्थापन अधिनियम 2005 नुसार, जिल्ह्यातील या आजाराच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक उपाययोजनांच्या कामांची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे. त्यामुळे अशी कामे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच सर्व शासकीय तसेच निमशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.