मुंबई – अचानक भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सर्व राजकारण्यांना धक्का दिला होता. जरी फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार फक्त 72 तास टिकले असले, तरी या शपथविधीची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना होती, अशा प्रकारचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मात्र शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हे दावे फेटाळून लावले आहे. अजित पवार यांनी तर याविषयी भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पण राजकीय वर्तुळात सातत्याने वावरणारे नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी यासंबंधी सूचक वक्तव्य केलंय. माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू म्हणाले,’अजित पवार आणि शरद पवार एकाच घरात. मग पहाटे उठून अजित पवार शपथविधीसाठी जात होते, हे काय शरद पवार यांना माहिती नसावं? ते अनभिज्ञ होते, यावर विश्वास बसत नाही’ असं म्हणत बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला पाठिंबा दिला आहे.
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’ शरद पवार यांनी हिरवी झेंडी दिली असेल म्हणूनच अजित पवार पुढे गेले असावेत. पण राष्ट्रवादीचे नेते हे मान्य करत नाहीयेत. मग माझा दुसरा प्रश्न आहे.. पवार साहेबांना सोडून अजित पवार यांनी शपथविधी घेतला असेल. बंडखोरी केली तर त्यांना उपमुख्यमंत्री कसं केलं. ज्यानी बंड केलं, त्यालाच पदावर बसवलं, असं पक्षाचं धोरण असेल तर इमानदारीनं वागणाऱ्या आमदाराचं काय असा मोठा प्रश्न आहे..’