श्रीगोंदा – मुंबई आणि ठाण्यात राहणारा मराठी माणूस हा एकनाथ शिंदे यांच्यामुळे नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगत आहे. सत्तेच्या लोभापाई 40 आमदारांनी पळून जात सत्ता स्थापन केली, मात्र शिवसेना ही जागेवरच राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ही कोणी सहजासहजी पळवुन नेऊ शकत नसल्याची टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.
काष्टी येथे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन खा. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, संदेश कार्ले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, जिल्हा बॅंक संचालिका अनुराधा नागवडे, संभाजी कदम, योगीराज गाडे, राजेंद्र भगत उपस्थित होते.
खा. राऊत म्हणाले, सत्ता लोभापायी आमदार, खासदार पळून गेले, मात्र त्यांना आमदार आणि खासदार करणारे लाखो शिवसैनिक जागेवरच आहेत. हेच शिवसैनिक विधानसभेत आणि लोकसभेत पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकाविल्या शिवाय राहणार नाही. शिवसेनेत पंचवीस तीस वर्ष घालविल्यावर नेतेपद सोडाच तर साधे शाखाप्रमुख देखील होता येत नाही. नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यावर नेते झाले तर एकनाथ शिंदेंना तर आत्ता आत्ता नेते पद मिळाले होते.
शिवसेनेत पदे तोलून मापून दिले जातात, मात्र साजन पाचपुते यांच्याकडे पाहिल्यावर जन्माने शिवसैनिक असल्याचे दिसून येत त्यांचा पिंड शिवसैनिकाचा आहे. प्रतिकूल परिस्थितीत काष्टी ग्रामपंचायत निवडणूक जिंकून अस्तित्व निर्माण करीत स्वतःचे नाव मोठे केले. या भागात शिवसेना वाढवायची आणि शिवसेनेचा विचार पुढे न्यायचा यासाठी साजन पाचपुते सारख्या तरुण कार्यकर्त्याला ताकद आणि प्रतिष्ठा देत मोठी जबाबदारी दिल्याचे खा. राऊत म्हणाले. यावेळी वाकचौरे, आ. शिंदे, फुलसौंदर, अनुराधा नागवडे, संदेश कार्ले, सुरेश देशमुख, साजन पाचपुते, बाळासाहेब दुतारे, संतोष खेतमाळीस यांनी मनोगत व्यक्त केले.