कोपरगाव – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोपरगाव शहरात सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी सोमवारी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असून, सरकारने मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण त्वरित देऊन न्याय द्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.
कोपरगाव शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ साखळी उपोषण सुरू आहे. आज सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विवेक कोल्हे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विवेकभैय्या कोल्हे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी उपोषणकर्ते विनय भगत, अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, अमित आढाव, सुनील साळुंके, बाळासाहेब नरोडे, केशवराव भवर, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, विनोद राक्षे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, मनसेचे संतोष गंगवाल, माजी नगरसेवक बबलूशेठ वाणी, गणेश आढाव, संदीप देवकर, बापू पवार आदी उपस्थित होते.
मराठा समाजाच्या साखळी उपोषणास आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून विवेक कोल्हे म्हणाले, मराठा समाज हा जगाचा पोशिंदा व अन्नदाता असून, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजबांधव शेती व्यवसाय करतात. निसर्गाच्या अवकृपेमुळे आज शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असून, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेला मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आता मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला असून, सरकार समाजाला निश्चितच न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त करून कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन कोल्हे यांनी केले.