मुंबई – मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीवरून वाद सुरू झाला आहे. समाधीच्या सजावटीवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. गुन्हेगाराची समाधी का सजवली, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. शेकडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या माणसाच्या कबरीला इतका आदर का दिला जातो? असा प्रश्नही भाजप नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या वादावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले,’मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
यावर आदित्य ठाकरेंनी वृत्तमाध्यमांशी बोलतांना भाजप नेत्यांना सडेतोड उत्तर देत प्रतिप्रश्न विचारला आहे.’पहिली गोष्ट म्हणजे त्या माणसाचं दफन का झालं? आपण त्याला अतिरेकी म्हणून फाशी दिली. ओसामा बिन लादेनचं समुद्रात दफन झालं. मग याचं एवढं मोठं दफन यांनी का केलं? शिवाय दफन करताना एनओसी घेणं गरजेचं आहे. ती एनओसी कुठेही नाही. महत्त्वाचं म्हणजे ही ट्रस्ट खासगी आहे, महापालिकेचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही.’असा प्रतिप्रश्न ठाकरे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले,’“एक तर सणाच्या दिवसांमध्ये राजकारण ही एक घाणेरडी गोष्ट झालीये. याप्रकरणातली तथ्य लोकांसमोर यायला हवीत. आरोप करणं सोपं असतं. पण खरं बोलणं कधीकधी कठीण असतं. आज खरं बोलणं गरजेचं आहे’ असेहीआदित्य ठाकरे म्हणाले आहे.