जळोची(प्रतिनिधी) – शहरात विनाकारण गर्दी करणारे व मास्क न लावता फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत आज पहिल्याच दिवशी मास्क न वापरता फिरणाऱ्या ५३ नागरिकांवर कारवाई करत तब्बल १० हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
बारामती शहर ‘कोरोना मुक्त’ झाल्यानंतर अनेक दिवस बंद असलेल्या बाजारपेठांना काही नियम व अटीं वरून बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र अनेक जण अन लाँकचा गैरफायदा घेत आहेत. बाजारपेठ सुरू झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी गर्दी वाढत असून, मास्क विना फिरणाऱ्यांंचीही वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. करोना चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने मास्क नलावता फिरणार्यांवर पोलीस व नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून, मास्क न लावता शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस व नगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात करण्यात आली. शहरात मास्क विना आढळून आलेल्या नागरिकांवर २०० रुपये दंडाची कारवाई करण्यात येत असून, आज ५३ नागरिकांवर कारवाई करून १० हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
-राजेंद्र सोनवणे,( आरोग्य निरीक्षक बारामती, नगरपालिका)
शहरात करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून बारामती शहरात ‘बारामती पॅटर्न’ यशस्वीरित्या राबविण्यात आला. ‘बारामती पॅटर्न’ मुळे शहर करोना मुक्त झाल्यानंतर बारामतीकरांची अडचण होऊ नये म्हणून, काही नियम व अटींना अधिन राहून बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या. मात्र विविध वस्तू खरेदीसाठी येणारे बरेच नागरिक मास्क न लावतात दुकानातून वस्तू खरेदी करत आहेत. तसेच शहरात ठिकठिकाणी विनाकारण गर्दी करून थांबताना दिसून येत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलीस व नगर पालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असणाऱ्या या संयुक्त कारवाईचे बारामतीतून स्वागत केले जात आहे.
व्यापारी व नागरिकांकडून नियमांचे होतेय उल्लंघन…..
शहरात काही व्यापारी व दुकानदारांकडून वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकाच्या हातावर सैनीटायझर दिले जात नाही तसेच अनेक ठिकाणी नागरिक मास्क न लावतात वस्तू खरेदीसाठी दुकानात गर्दी करत असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे पुन्हा शहरात कोरोना ची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.