जे. पी. नड्डा : भाजपचा विजय संकल्प मेळावा
पुणे – गेले पंधरा वर्षे ज्यांची सत्ता होती त्यांनी महाराष्ट्राची प्रतिमा देशपातळीवर मलीन केली, ही प्रतिमा सुधारण्याचे काम गेल्या 5 वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्यात त्यांना यश आले आहे. राज्यात विकासाचा नवा चेहरा उभा राहात आहे, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी येथे सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या वतीने विजय संकल्प मेळावा घेण्यात आला. यात ते बोलत होते. या प्रसंगी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पश्चिम महाराष्ट्रातील खासदार, आमदार तसेच शहरातील पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. याशिवाय नुकतेच भाजपमध्ये सामील झालेले इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना काश्मीरमधून हटविण्यात आलेल्या 370 कलमाबाबत मार्गदर्शन केले.
काश्मीरमधून 370 कलम हटविण्याचा मुद्दा हा भाजपच्या दृष्टीने कधीही राजकीय नव्हता. आम्ही सत्तेत आल्यावर सर्व प्रथम काश्मीरला 370 कलमातून मुक्त केले. आज तेथील जनता खऱ्या अर्थाने भारतीय झाली आहे. तेथील जनतेने सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला आहे. जम्मू-श्रीनगरमध्ये नागरिक सुद्धा आनंदात आहेत, असेही नड्डा यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील पूर्वीच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराला येथील जनता कंटाळली होती. गेले पंधरा वर्षे या राज्यात पूर्ण बहुमताने एकदाही सरकार स्थापन झाले नव्हते. त्यामुळे एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रकार सुरू होते. त्यातून नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे सुद्धा वाढली होती. मुख्यमंत्री पदासाठी संगीत खुर्ची सुरू होती. त्यामुळे विकास होत नव्हता, पण गेले 5 वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने “स्वच्छ मुख्यमंत्री’ मिळाला आहे. त्यांनी राज्याला विकासाचे एक नवे मॉडेल दिल्याचेही नड्डा म्हणाले.