राष्ट्रवादीवर जाहीरनामा थांबवण्याची नामुष्की
मुंबई (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमिवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार होता. जाहिरनामा जाहिर करण्याचा सोमवारचा मुहुर्तही ठरला होता. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे स्वत: जाहीरम्याचे प्रकाशन करणार हे निश्चितही झाले.
पण ऐनेवेळी कॉंग्रेसमुळे राष्ट्रवादीला जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम थांबवण्याची नामुष्की ओढावली. निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी असल्याने आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जाहीरनामा तयार आहे. परंतु, निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी असल्याने आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाहिरनाम्याच्या प्रसिद्धीची तयारी सुरू होती. राष्ट्रवादीचे प्रतोद हेमंत टकले, जाहिरामा समितीच्या प्रमुख खासदार वंदना चव्हाण यांच्याकडून कुठले मुद्दे मीडियासमोर प्रकर्षाने यावेत याची चर्चाही सुरू होती. मात्र प्रवक्ते नवाब मलिक यांनी ऐनवेळी येऊन हा जाहीरनामाच गुंडाळल्याचे जाहीर केले.
मलिक यांनी यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि त्यांनी उपस्थितीत केलेल्या कलम 370 च्या मुद्यावरून जोरदार टीका केली. काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, याबद्दल दुमत नाही. कलम 370 चा निर्णय लोकांना विश्वासात घेऊन घ्यायला हवा होता. परंतु, तसे झाले नाही. काश्मीरची जागा आता पर्यटनाच्या नावाखाली खरेदी केली जाणार असून ती अदानी, अंबानींच्या घशात घालण्यात येणार असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.
आमच्या पक्षाच्या नावात राष्ट्रवाद आहे. त्यामुळे तो असली आहे. भाजपचा राष्ट्रवादी नकली असून आमचे नेते शरद पवार हे शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचे राजकारण करतात. त्यामुळे त्यांचे राजकारण कधीच संपणार नाही. परंतु, भाजपचे गोळवळकर गुरूजींच्या विचाराचे राजकारण किती काळ टिकेल हे सांगता येत नाही, असा टोलाही मलिक यांनी लगावला.