पुणे – विविध क्षेत्रांप्रमाणेच सी.ए. (सनदी लेखापाल) हे सर्वांत प्रभावशाली आणि समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक आहेत. त्यामुळे सीएंच्या समस्या दिल्लीत सोडविण्यासाठी काम करायचे आहे, अशा भावना पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.
पुणे सीए फॅटर्निटीच्या वतीने आयोजित “सीए संवाद रोड टू विकसित भारत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शशिकांत बर्वे, राजेश अग्रवाल, विवेक मठकरी, रेखा धामणकर, शिरीष कुलकर्णी यांच्या सह चार्टर्ड अकाऊंटंट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी समाजाच्या शेवटच्या घटकांचा सर्वांत पहिल्यांदा विचार केला. हे करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर देश महासत्ता होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांचाच आदर्श घेत मागच्या पाच वर्षांत पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी खूप काम केले. पुढच्या २५ वर्षाचा विचार करता नवीन विमानतळ, जुन्या विमानतळाचे विस्तारीकरण, मेट्रोचा विस्तार असे अनेक विषय पुढे घेऊन जायचे आहेत.
सीए मंडळींच्या अनेक समस्या असतील, तर त्या दिल्लीत सोडविण्यासाठी काम करायचे आहे; आणि तुम्ही देणारी जबाबदारी शंभर टक्के पार पाडू,’ अशी ग्वाही मोहोळ यांनी या वेळी दिली. तर, “सीए राजकारणापासून नेहमीच लांब असतात. जेव्हा सीएंवर अन्याय होतो, तेव्हा सीए त्याचा संघर्ष करत नाहीत. त्यामुळे भविष्यात सीएंनी एकत्रित येण्याची गरज आहे. जे आपले प्रतिनिधी होणार आहेत, त्यांच्या पाठिशी आपण आपली ताकद उभी केली पाहिजे,’ अशी भावना सीए दिनेश गांधी यांनी व्यक्त केली.
समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – पाटील
सीएच्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. समाजाच्या विकासात योगदान देणाऱ्यांमध्ये सीएंचादेखील समावेश आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण सीएंनी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
सीए वर्गाने असे समाजाच्या सर्वांगीण विकासात अडथळे निर्माण होणारे प्रश्न निदर्शनास आणून दिले, तर त्याचा सकारात्मक प्रतिसाद देऊ. तसेच, सीएंनी आपल्या समस्यांसाठी नेहमीच प्रशासनाशी संवाद ठेवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.