पुणे – साधू वासवानी पुलावरून उतरल्यानंतर बंडगार्डन वाहतूक शाखा पोलीस चौकी, नवीन शासकीय विश्रामगृहापर्यंतचा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना म्हणून तेथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस प्रशासनाकडे द्यावा.
यासह लोकसभा निवडणुकीमुळे शहरामध्ये राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत, यामुळे वाहतुकीत बदल केल्याने वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर साधू वासवानी पुलाचे काम पुणे शहरातील मतदानानंतरच सुरू करण्यात यावे, अशी चर्चा नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये झाली.
कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी नवीन पुलाच्या कामापूर्वी नवीन शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. महापालिका व पुणे पोलिस यांच्यासह विविध विभागीय अधिकाऱ्यांची बैठकी नुकतीच झाली, यामध्ये सदर निर्णय घेण्यात आला. साधू वासवानी पुलाला ५० पेक्षा अधिक वर्षे झाल्याने संबंधित पूल धोकादायक झाल्याने हा पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. १५ एप्रिलला या कामाची भूमिपूजनही झाले आहे. त्यानंतरही रेल्वे प्रशासन व वाहतूक विभागाकडून परवानगी न मिळाल्याने पुलाचे काम रखडले होते. परंतु, त्यास आता रेल्वेने परवानगी दिली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात होणाऱ्या सभा त्याअनुषंगाने वाहतुकीत होणारे बदल यामुळे सदर काम काही दिवस पुढे ढकलण्यात यावे की काय, यासंदर्भातील चर्चेसाठी महापालिकेच्या विविध विभागांची नुकतीच बैठक झाली.
या बैठकीस पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, सार्वजनिक बांधकामचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, विशेष प्रकल्प विभागाचे अधिक्षक अभिजित डोंबे, कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
“साधू वासवानी पुलाचे काम साधारण १५ मे पासून सुरू करण्यात येईल. साधू वासवानी पुलापासून ते नवीन शासकीय विश्रामगृहापर्यंतचा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे हा रस्ता मोठा करण्यासाठी प्रस्ताव देण्याबाबतही चर्चा झाली असून ते कामही पूर्ण करण्यात येईल.” – रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
“साधू वासवानी पुलाबाबत महापालिका, पोलीस, लष्कर, सार्वजनिक बांधकाम अशा विविध विभागांच्या झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणूक मतदान झाल्यानंतरच पुलाचे काम सुरू करण्याचे निश्चित झाले आहे.” – श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), महापालिका