राष्ट्रवादी, भाजपची नारळ फोडायची घाई
– धिरेंद्र गायकवाड
कात्रज – नारळ फोडायची घाई अन् कामाचा नाही पत्ता…, अशी अवस्था कात्रज-देहू बायपास रस्त्याबाबत झाली आहे. या कामाचा पाठपुरावा खासदार सुप्रिया सुळे यांनीच केला, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केला जात असताना कामाच्या शुभारंभाला भारतीय जनता पक्षाने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आणून श्रेय घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, या सोहळ्यानंतर या रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांची जबाबदारी गडकरी घेणार की सुळे? असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत.
कात्रज-देहू बायपास रस्त्यावर मंगळवारी (दि. 6) झालेल्या विचित्र अपघाताने येथील बायपास रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या बाह्यवळण रस्ता रुंदीकरणासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाने 87 कोटी रुपये मंजूर केले असल्याचे आणि काम आमच्याच पक्षामुळे सुरू झाल्याचा ढोल राष्ट्रवादी आणि भाजपकडून वाजवला जात असताना कामाने मात्र अद्यापही गती घेतलेली नाही.
काम होण्यापूर्वीच श्रेय लाटण्यासाठी या पक्षांची हातघाई सुरू असली तरी कामात मात्र अशी घाई दिसत नाही. राष्ट्रवादीने केलेल्या दाव्यानुसार खासदार सुळे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या या कामाचा शुभारंभ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नारळ फोडून झाला, त्याला आता 8 महिने उलटून गेले आहेत. हा सोहळा जोरदार झाला असताना काम मात्र सुरू झालेले नाही. कात्रज-देहू बायपास रस्त्याचे काम होत नसल्याने मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. यातूनच अपघाताचे सत्र सुरू आहे. कात्रज ते नवले उड्डाणपूल इथपर्यंत या रस्त्याची लांबी पाच किलोमीटर आहे. यात अनेक ठिकाणी रस्ता चढ-उताराचा आहे.
बाह्यवळण रस्त्यावरून कात्रज-कोंढव्याकडे जाणाऱ्या वाहनांत 12, 16 चाकी ट्रेलर, ट्रक अशा अवजड वाहनांची संख्या अधिक आहे, अशी वाहने दिवस-रात्र या रस्त्यावरून धावत असतात. याच रस्त्यावर दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. बाह्यवळण रस्त्यावर अनेक ठिकाणी बसेस व ट्रक थांबलेले असतात, अशात अपघात झाल्यास मोठी प्राण तसेच वित्तहानी होत आहे. आता, रस्त्याच्या कामात राजकीय पक्षांची चढाओढ सुरू असताना या रस्त्याचे काम केव्हा आणि कसे होणार? हा मोठा प्रश्न आहे.
करोनामुळे रस्त्याची सर्व कामे बंद होती. तसेच, पुणे मनपाने पावसाळी लाइन व ड्रेनेजलाइन या मार्गातून काढलेल्या नाहीत. ज्या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मनपाला रस्त्याविषयी कामासंदर्भात विचारले होते. त्यावेळी मात्र मनपाने कामाविषयी कळवले नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने लवकर कळवून कामास गती देण्याचे गरजेचे होते. या लाइन शिफ्ट होणे गरजेचे आहे.
– भीमराव तापकीर, आमदार, खडकवासला मतदारसंघ (भाजप)
करोना काळामध्ये कॉन्ट्रॅक्टरकडील कामगार गावाला गेल्याने काम बंद होते. केंद्राकडून जरी निधी दिला गेला असला तरी महापालिकेतील सत्ताधारी भाजप मार्फत रस्त्याच्या कामातील परवानगीसाठी दिरंगाई होत आहे. खासदार सुप्रिया सुळे वेळोवेळी या कामाला भेट देत असून काम व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.
– युवराज बेलदरे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
कात्रज ते नवले ब्रिज मार्गावर 2019-20 या वर्षांमध्ये आतापर्यंत 38 अपघात झाले व 19 मृत्यूही घडले. या मार्गावर काही ठिकाणी चढ-उतार आहे. दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. हा मार्ग अवघा 5 कि.मीचा असून ओव्हर स्पीडमुळेही अपघात घडत आहेत.
– कृष्णाजी इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन.