कातरखटाव – माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि कारखान्याची धुराडी पेटलेली पाहण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यामुळे मी तुमच्या गावात आलो आहे, असे प्रतिपादन माजी आमदार जयकुमार गोरे केले. माण-खटाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ कातरखटावमध्ये कोपरा सभा झाली. ते म्हणाले, आमदार म्हणून माझे कर्तव्य काय आहे, त्याचे भान ठेवून मी निवडणुकीला उभा आहे.
मी जो शब्द दिला, तो पूर्ण केला आहे. बधाऱ्यांची साखळी केली नसती तर पावसाचे पाणी आज कुठे गेले असत? या बंधाऱ्यांमुळेच येथील शेतकरी आपल्या शेतात पाणी मुरवतोय. विरोधक यानंतर येथे सभा घेतील. त्यावेळी तुम्ही त्यांना एवढेच विचारा की, पाणी कुणी आणले आहे? सगळे विरोधक माझ्या विरोधात एकत्र आले आहेत.
माझ्याविरोधात एकट्याने लढायची त्यांची ताकद नाही; पण “माझं ठरलंय’ की शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणायचं. विरोधकांचं काय ठरलंय, ते कळू द्या. शिवसेनेचा तर एक गडी वह्या, पेन, साड्या वाटत असून गावागावात भांडणे लावण्याचे उद्योग सुरू आहेत. विरोधकांच्या भूलथापांपासून सावध रहा. पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, रामभाऊ देवकर, बाळासाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य धंनजय चव्हाण, विशाल बागल, अजित सिंहासने व कार्यकर्ते उपस्थित होते.