डॉ. दिलीप येळगावकर : तालुक्याला लागलेलं घाणेरडं वळण घालवायचयं
सातारा – आता आपलं काही खरं नाही, हे कळून चुकल्यामुळे माजी आमदार काही पण बडबडू लागले आहेत. त्यांच्या नशिबात मंत्रिपद तर सोडाच पण आमदारकीसुध्दा नाही. त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघाती टोला माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी माजी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.
कातरखटाव (ता. खटाव) येथे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, संदीप मांडवे, महेश गुरव, नंदकुमार मोरे, कातरखटावचे सरपंच तानाजी बागल, नंदकुमार गोडसे, बंडा गोडसे, पृथ्वीराज गोडसे, नाना पुजारी, वडूजचे माजी नगराध्यक्ष महेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. येळगावकर म्हणाले, “आमची मापं काढायची यांची लायकी नाही. यांनी मागील दहा वर्षात या मतदारसंघाची बेअब्रू केली. सत्ताधारी पक्षातून निलंबित झालो तरी आम्ही घाबरत नाही. कारण या तालुक्याला लागलेलं घाणेरडं वळण आम्हाला घालवायचं आहे.” माजी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले, “गरज संपली की मुख्यमंत्र्यांनासुध्दा फेकून द्यायची वृत्ती असलेली ही प्रवृत्ती आता आपण फेकून दिली पाहिजे.
कार्यकर्त्याला लाचार करणारं असलं नेतृत्व संपवलं पाहिजे. विकास तर सोडाच पण सुसंस्कारित कार्यकर्त्यांची फळी हे उभी करु शकले नाहीत.’ यापुढे माण-खटावमध्ये सर्वांच्या संमतीचं व सन्मानाचे राजकारण होईल. तरुणांमधील उत्साह व उर्जा बघता परिवर्तन शंभर टक्के होणार आहे, असा दावा प्रभाकर देशमुख यांनी केला. पोलिसांना घाबरुन पळून जाणाऱ्या पळपूट्यांनी आमच्यावर बोलू नये. खोटं बोलणं, लबाडी अन फसवणूक हे जनता आता सहन करणार नाही. त्यांची आता परत जाण्याची वेळ आली आहे. लोकांना विकत घ्यायची भाषा करणाराला आता घरी पाठवायचं आह,े असे आवाहन त्यांनी केले.
कातरखटावच्या स्टेजवर येताना या बांडगुळाला लाज वाटली पाहिजे. मतदारसंघात अजून छावण्या सुरु आहेत अजून टॅंकर सुरु आहेत. मतदारांनो वाली कोण व मवाली कोण यातला फरक समजून घ्यायची वेळ आली आहे, अशी टीका अनिल देसाई यांनी केली. यावेळी उदयनराजेंचे समर्थक वडूजचे माजी नगराध्यक्ष महेश गुरव यांनी “आमचं ठरलंय’ टीमला व प्रभाकर देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला.