लातूर… एकेकाळचे महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र, मराठवाड्याचे नॉलेज हब, मोठी बाजारपेठ आणि सधन असा जिल्हा. पण, शिवाजीराव निलंगेकर- 10 महिने आणि विलासराव देशमुखांच्या रूपाने तब्बल 8 वर्षे मुख्यमंत्रीपद, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिपदे आणि खंडीभर पदाधिकारी असा लवाजमा असलेल्या या लातूरला आज पिण्याच्या थेंबभर पाण्यासाठी तरसावं लागत आहे. नेते येतात, सत्ता बदलते पण समस्या वर्षानुवर्षे त्याच आणि तशाच. सध्या येथून अमित विलासराव देशमुख आमदार आहेत. पण, गेल्या काही वर्षांत भाजपने लातूर जिल्ह्यात चांगले बस्तान मांडले आहे. लातूर महानगरपालिका कॉंग्रेसकडून हिसकावून घेतली आहे. लोकसभा सलग दुसऱ्यांदा जिंकली आहे. आता लातूर शहर जिंकण्याचा भाजपचा मनसुबा आहे.
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीधर्मातून लातूर शहरातील भाजप कमजोर राहिली. त्याचा फायदा गोपीनाथ मुंडे यांनी शेजारच्या रेणापूर मतदारसंघात घेतला होता. आजमितीला लातूर महानगरपालिकेची सत्ता भाजपने खेचून घेतली. जातीय समीकरणामुळे येथून कायम कॉंग्रेसला लीड मिळाली आहे. मात्र, महापालिका आणि लोकसभा निवडणूक पाहता या समीकरणात बदल होत आहे. भाजपचा वाढता जोर आणि कॉंग्रेसमधील नैराश्येचं वातावरण यामुळे यावेळी बदल घडणार, अशी चर्चा आहे. विलासराव देशमुख यांचा वारसा अमित देशमुख यांची यंत्रणा ही कॉंग्रेसची जमेची बाजू आहे. त्यातच भाजपचा उमेदवार कोण यावरही बरच अवलंबून आहे. भाजपकडे अमित देशमुख यांच्या विरोधात सध्या सक्षम उमेदवारच नाही. मात्र, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे वेगवेगळी गणिते जमवण्यात व्यस्त आहेत.
सोबतीला पंकजा मुंडे यादेखील येथून मदत करू शकतात. त्यामुळे कॉंग्रेसला लातूरचा गड राखणे कठीण जाण्याचा अंदाज आहे. कारण, अमित देशमुख अजूनही पाहिजे तसे जनतेत मिसळलेले नाहीत. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता कॉंग्रेसपासून दुरावला आहे. मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या तितकासा समृद्ध नाही. पिण्याच्या पाण्याची नेहमीच टंचाई राहिली आहे. त्यामुळे देशमुख यांच्याविरुद्ध मोठी नाराजी आहे. भाजपने याठिकाणी स्वच्छ व नवा मराठा उमेदवार दिल्यास अमित देशमुख यांची कोंडी होऊ शकते. कारण वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेसच्या पारंपरिक मतांवर डल्ला मारणार, हे निश्चित आहे. राष्ट्रवादीची ताकद या मतदारसंघात तशी नसल्यातच जमा आहे. तर शिवसेना एका हॉटेलमधून चालवली जाते. त्यामुळे युती आणि आघाडीची गणिते येथे फारशी प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे विलासराव देशमुख यांची पूर्वपुण्याई कॉंग्रेसला तारू शकते, अशी चर्चा असून टंचाई काळात रेल्वेने पाणी पुरवल्याच्या ऐतिहासिक पुण्याईचे भांडवल यंदाच्या निवडणुकीतही भाजपकडून केले जाण्याची दाट शक्यता आहे. कारण, इतर कोणतेही नवीन मुद्दे दोन्ही पक्षांकडे नाहीत. एक उड्डाणपूल आणि किरकोळ रस्ते वगळता सांगण्यासारखं काहीही नाही. तर प्रस्तावित रेल्वे बोगी निर्मिती कारखाना हा भाजपचा मुद्दा असेल.
आमदार अमित देशमुख यांनी गेल्या महिनाभरापासून जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. दररोज एक पदयात्रा, परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरी भेट देऊन संवाद, तेथील कार्यकर्त्यांच्या घरी बैठक या माध्यमातून देशमुख संपर्क करीत आहेत. त्याचबरोबर नगरसेवक, आमदार फंडातील कामांचे भूमिपूजन करण्याचाही सपाटा त्यांनी लावला. तर, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर. यांनीही गेल्या महिनाभरापासून मतदारसंघात तळ ठोकला असून कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचणे, विकासकामांचे भूमिपूजन उरकणे, पूर्ण झालेल्या कामांची उद्घाटने करणे, गावोगावी भेट देऊन लोकांच्या भेटी गाठी घेण्यावर त्यांचा जोर आहे. त्यामुळे उमेदवार कोणीही असला, तरी अप्रत्यक्ष दोन हात हे दोन्ही नेतेच करणार आहेत.