नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सांगवी – दूषित पाणी पुरवठा पुन्हा झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जुनी सांगवीतील नागरिकांवर पाण्याबाबत नेहमी दुजाभाव केला जात असल्याचा तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. सतत येणाऱ्या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
संपूर्ण परिसरात गढूळ व गाळमिश्रित पाणीपुरवठा झाल्यामुळे हे पाणी कसे प्यायचे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पिण्यासाठी असलेल्या पाण्यातच घाण येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
जुनी सांगवीतील पाणीप्रश्नाबाबत नगरसेवक किंवा प्रशासन लक्ष देत नसून, पाणीप्रश्नी कायमच वेळ मारून नेली जात आहे. गेल्या शनिवारी मोठ्या प्रमाणावर गढूळ पाणी आल्याने जयमालानगर, पवारनगर, शिंदेनगर परिसरात अनेकदा असा प्रकार घडत आहे. त्यामुळे नेमके कशामुळे गढूळ पाणी येत आहे, याचा छडा अधिकाऱ्यांनी लावला पाहिजे. परिसरात स्वच्छ पाणीपुरवठा करावा अन्यथा नागरिकच प्रशासनाला आंदोलनाच्या मार्गाने जाब विचारतील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रोहित शेळके यांनी दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी आलेले पाणी अत्यंत गढूळ व दुर्गंधीयुक्त आहे. सध्या साथींचे रोग फैलावत असतानाच असा दूषित पाणीपुरवठा झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने याप्रश्नी तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा.
– नारायण पवार, स्थानिक रहिवाशी