नवी दिल्ली – देशातील बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे विलिनिकरण आणि इतर अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सोमवारी या संघटनांनी अर्थ विभागाचे सचिव राजीव कुमार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगत संप मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक आफिसर्स असोसिएशन (AIBOA), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (INBOC) आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (NOBO) या संघटनांनी संपाची घोषणा केली होती. या चार संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपाचा इशारा दिला होता.
चौथा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून हा संप पुकारण्यात आल्याने बँकेचे कामकाज चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. केंद्र सरकारने 10 बँकांचे विलिनिकरण करून 4 मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आणि आपल्या अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. परंतु आता हा संप मागे घेण्यात आल्यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे.