मेदिनगर – भारतीय जनता पक्ष केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करू असे आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे. झारखंडच्या पलामाऊ जिल्ह्यातील एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले.
कॉंग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की युपीए सरकार सत्तेवर असताना पाकिस्तानचे दहशतवादी गट भारतात वारंवार हल्ला करायचे. दहशतवाद्यांकडून जवानांचे शिरही कापून नेले जायचे. पण आम्ही देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करीत नाही. पाकिस्तानला काश्मीर भारतापासून तोडायचे आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही. पाकिस्तानकडून गोळी आली तर आमच्याकडून तोफेचे गोळे तिकडे जातील असा इशाराही त्यांनी दिला. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे पण एकाच देशात आम्ही दोन पंतप्रधान होऊ देणार नाही असे ते म्हणाले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे असे ते म्हणाले. भारताने बालाकोटवर हल्ला केल्यानंतर देशात मिठाई वाटली गेली पण काही जणांच्या गटांत मात्र नैराश्य निर्माण झाले आहे असेही त्यांनी नमूद केले.