अहमदनगर – काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्वपक्षातील नेत्यांवर निशाणा साधत आपली भूमिका मांडली. “राष्ट्रवादीने काँग्रेससाठी नगरची जागा सोडावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र स्वत: राहुल गांधीच पाठिशी राहिले नाहीत. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढा, असं म्हणणं माझ्यासाठी धक्कादायक होतं, असं राधाकृष्ण विखे पाटील पत्रकार परिषदे दरम्यान सांगितले.
अहमदनगर लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच दिला. त्यांची ही भूमिका पाहून धक्का बसला. नगरला राष्ट्रवादीचा तीनवेळा पराभव झाला. त्यामुळं ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी होती. पवारांना त्यासाठी भेटलो. पण आमच्याच पक्षातल्या नेत्यांनी ती जागा काँग्रेसला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. अशी टीका विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता केली.
तसेच शरद पवारांचं स्वर्गीय बाळासाहेब विखेंबद्दलचं वक्तव्य वेदनादायी होत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही ही भूमिका घेतली, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
गेल्या साडेचार वर्षात पक्षाने जी जबाबदारी सोपवली, त्याद्वारे राज्यातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला, सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं, असंही यावेळी त्यांनी सांगितल.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला त्यानंतर काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ते भाजप किंवा शिवसेनेत दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण निवडणूक झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करू, अशी भूमिका विखे पाटलांनी पक्षप्रवेळाबाबत यावेळी मांडली.