सातारा -राज्यातील शिंदे व भाजप युतीचे सरकार पाच वर्ष निश्चित पूर्ण करणार आहे. आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. केवळ बॅनरबाजी करून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. या माध्यमातून विरोधक राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. शासकीय योजनांची जत्रा आणि शिवदूतांची नेमणूक याबाबत आयोजित आढावा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
ते पुढे म्हणाले, राज्यात शिंदे सरकारचे 16 आमदार अपात्र होणार अशी चर्चा असून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशा वावड्या उठवल्या जात आहेत. या संदर्भातील प्रश्नावर बोलताना क्षीरसागर म्हणाले, असे काही नाही कोणीही बॅनर लावला म्हणून तो मुख्यमंत्री होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे, हे पाच वर्षे सरकार पूर्ण करणार आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतरही शिंदे व भाजप युतीचेच सरकार येणार आहे. विरोधकांनी कितीही संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला तरी त्याने काही फरक पडत नाहीत.
आमची विकास कामेच आमचे नैतिक बळ असून ती कामेच बोलत असतात. राज्य शासनाचे 16 आमदार अथवा त्या संदर्भातील निकालाच्या संदर्भात बोलताना क्षीरसागर म्हणाले, हा सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारितील विषय आहे त्यावर मी बोलू शकत नाही. पण निकाल आमच्याच बाजूने लागणार असा आमचा ठाम विश्वास आहे आमच्या मांडणीमध्ये खरेपणा आहे. त्यामुळे खरेपणाला न्याय मिळणार हे निश्चित असे ते म्हणाले. अजित दादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चे संदर्भात त्यांना छेडले असता ते म्हणाले, कालच महा विकास आघाडीची मुंबईत वज्रमुठ सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा अजित पवार उपस्थित होते व तिकडेही त्यांची उपस्थिती इकडे भाजप प्रवेश असे होऊ शकत नाही.
एकाच वेळी विरोधक काय काय करतील ? अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेची खिल्ली उडवली. शासकीय योजनांच्या जत्रेच्या माध्यमातून शासनाच्या सर्व विभागाच्या योजना सर्वसामान्य जनतेला सांगणे. त्याचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ते लाभ सुनिश्चित करून शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाचा विस्तार करणे याकरिता मी साताऱ्यात आलो आहे. त्यासाठी प्रत्येक शहरात जिल्ह्यात वार्ड तेथे शिवसैनिक आणि या योजनांच्या प्रसिद्धीसाठी शिवदूतांची नेमणूक करणे इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या व्यापक प्रसार आणि प्रचारासाठी मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याने त्यांनी सांगितले