जकार्ता – जपानकडून पराभूत झालेल्या भारताच्या पुरुष हॉकी संघाने जणू सरस कामगिरीसाठी पेटून उठत यजमान इंडोनेशियाचा 16-0 असा धुव्वा उडवत आशिया करंडक हॉकी स्पर्धेत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी यजमान इंडोनेशियाचा बचाव केवळ भेदला नाही तर एखाद्या क्लब दर्जाच्या संघाविरद्ध एका पाठोपाठ गोल करावेत तसे गोल केले. या संपूर्ण लढतीत भारताने यजमान संघाला गोल करण्याची एकही संधी मिळू दिली नाही.
या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने बाद फेरीत चार संघात स्थान मिळवले. पाकिस्तानशी झालोली बरोबरी व त्यानंतर जपानकडून पत्करावा लागलेला पराभव यांमुळे या स्पर्धेत आजवर वर्चस्व राखलेल्या भारतीय संघाला हा सामना किमान 15 गोलच्या फरकाने जिंकावा लागणार होता. तेच गुरुवारी भारतीय संघाने केले व 16-0 असा दणदणीत विजय प्राप्त करत बाद फेरी गाठली.
Magnificent game for #MenInBlue as they mark a big win against Indonesia at the Hero Asia Cup 2022 to qualify for the Super 4s of the Hero Asia Cup 2022!😍#IndiaKaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #MatchDay #INDvsINA @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/TJOEixswSk
— Hockey India (@TheHockeyIndia) May 26, 2022
भारतीय संघाकडून दीपसन तीर्कीने तब्बल 5 गोल केले. त्याला सुरेख साथ देताना सुखदेव बेलीम्गाने 3 गोल केले. एस. व्ही. सुनील, कीर्ती सेल्वम व पवन राजवीर या अनुभवी खेळाडूंनी प्रत्येकी 2 गोल केले. उत्तम सिंग व नीलमसंदीप झेस यांनी प्रत्येकी 1 गोल केला. हा भारतीय संघाचा जागतिक हॉकीच्या इतिहासातील दुसरा मोठा विजय ठरला.
पात्रता निकष पूर्ण झाला…
या स्पर्धेत भारतीय संघाला मोठा विजय तर मिळवावाच लागणार होता, पण परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एक पराभव होणे गरजेचे होते. तसेच घडले व भारताने मोठा विजय मिळवला तर, दुसरीकडे पाकिस्तानचा जपानकडून 3-2 असा पराभव झाला व सरस गुणांच्या जोरावर भारतीय संघाने बाद फेरी गाठली.
यापूर्वी 1932 साली ऑलिम्पिकमध्ये भारताने अमेरिकेचा 24-1 असा पराभव केला होता. पुढील वर्षी विश्वकरंडक हॉकी स्पर्धा भारतात होणार आहे, त्यामुळे यजमान म्हणून भारतीय संघ त्या स्पर्धेला पात्र ठरला असला तरीही ही स्पर्धा संघातील खेळाडूंसाठी तयारीच्या दृष्टीने महत्वाची मानली जात होती.