मुंबई – दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचे कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली. यामध्ये मनी लॉंड्रिंगचा संबंध नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दापोलीतील रिसॉर्ट हे सदानंद कदम यांच्या मालकीचे असून त्याच्याशी माझा काही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनिल परब म्हणाले, आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर आणि माझ्याशी संबंधित ठिाकणी छापे टाकले. गेल्या काही दिवसांपासून या अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. दापोलीचे साई रिसॉर्ट हे सदानंद कदम यांचे आहे, तसा दावा त्यांनी कोर्टात केला आहे. तसे सर्व कागदपत्रे ही त्यांनी जमा केली आहेत. हे रिसॉर्ट अजून सुरू झालेले नाही. तरीही या रिसॉर्टमधून पाणी हे समुद्रात जात असल्याचा आरोप करत केंद्रीय पर्यावरण खात्याने तक्रार केली. त्याच तक्रारीवरुन ईडीची आजची कारवाई आहे. हे रिसॉर्ट सुरूच नाही तर कारवाई कशी केली जाते हा प्रश्न आहे.
तसेच ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या आधीही उत्तरे देण्यात आली आहेत. बंद असलेल्या रिसॉर्टचे पाणी समुद्रात जात आहे असा आरोप करुन कारवाई केली जात आहे. यावर आता मनी लॉड्रिंगचा मुद्दा येतोय कुठे? या संबंधी आपण न्यायालयात भूमिका मांडू, असे त्यांनी सांगितले.