सातारा -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री रविवारी व सोमवारी सातारा जिल्ह्यात येत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रमाबरोबर अनेक विकासकामांचे भूमीपूजन, उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी दुपारपासून शरद पवार व अजित पवार शासकीय विश्रामगृहात असल्याने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
शरद पवार रविवारी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृहात येणार असून त्याचठिकाणी त्यांचा मुक्काम आहे. सोमवारी सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन केल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेची 39 वी वार्षिक सभा जकातवाडीच्या शारदाश्रमात होणार आहे. त्यानंतर तेथे फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार व युवा साहित्य पुरस्काराचे शरद पवार व मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.
उपमुख्यमंत्री रविवारी वाढे (ता. सातारा) येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. लोणंद येथील विविध विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. सोमवारी रयत शिक्षण संस्थेतील कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे. पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री रविवारी व सोमवारी जिल्ह्यात आहेत. राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी बळकट करण्यासाठी या दौऱ्यात काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. महिला आघाडी पदाधिकारी निवडीबाबतही यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे.
आबा, काकांना मिळणार शाबासकी
किसन वीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आ. मकरंद पाटील व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढवली आहे. या यशाबद्दल शरद पवार व अजित पवार यांच्याकडून पाटील बंधूंना शाबासकीची थाप मिळणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादीचे पॅनेल विजयी झाल्यानंतर दोन दिवसांनीच शरद पवार व अजित पवार जिल्ह्यात येत असल्याने आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.