मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता या सर्वात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मैदानात उतरले आहेत.
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचे चित्रीकरण करू देणार नाही अशी धमकी दिली आहे. त्या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या सिने अभिनेत्यांच्या सिनेमांचे चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करील तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या सिने कलाकारांचे संरक्षण करेल. त्यांच्या चित्रपटाच्या चित्रकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे शूटिंग होऊ देणार नसल्याची धमकी दिली आहे. अशी धमकी देणे चुकीची आहे. नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. हिंदी मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे.
काँग्रेस पक्षाने या अभिनेत्यांचा विरोध करताना त्यांच्या सिनेमाचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केला तर वेळ पडली तर रिपब्लिकन पक्षाचे कर्तकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल असे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे.