मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु, पूजा ही तीन वर्ष भाजपची कार्यकर्ती असल्याचा गौप्यस्फोट तिच्या वडिलांनी केला आहे.
पूजाचे वडील म्हणाले कि, पूजाने तीन वर्ष भाजपासाठी काम केले आहे. तिथे कोणी काही विचारत नव्हते. काय झालं नेमकं मला माहिती नाही. नुसती बदनामी सुरु आहे, पण साधा मला कोणी फोनही केला नाही. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांसोबत तिचे फोटो आहेत. पण कोणीही चौकशीसाठी फोन केला नाही. फक्त बदनामी सुरु आहे. सर्वांना सत्य समोर आल्यावर बोलले पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, कोणी कोणाचं नाव जोडून काहीतरी सांगत आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचे पूजाच्या वडिलांनी म्हंटले आहे.