मोदी-शहांना रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू
नवी दिल्ली – दिल्लीत हातमिळवणीची शक्यता मावळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्रात भाजप पुन्हा सत्तेत आल्यास त्याला एकटे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असतील, असे त्यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीसाठी आपचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर केजरीवाल पत्रकार परिषदेत बोलत होते. कॉंग्रेसशी आघाडी करण्याच्या उद्देशाने आपने सर्वतोपरी प्रयत्न केले. जागावाटपाबाबत कॉंग्रेसकडून अटी घातल्या जायच्या. आम्ही त्या मान्य केल्या की कॉंग्रेसकडून माघार घेतली जायची. विविध राज्यांत कॉंग्रेसकडून विरोधकांना दुबळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणत केजरीवाल यांनी उत्तरप्रदेश, केरळ, हरियाणा, गोवा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा उल्लेख केला. मोदी-शहा द्वयीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आप कसोशीने प्रयत्न करेल. धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असणाऱ्या एखाद्या पक्षाला किंवा महाआघाडीला पुढील सरकार स्थापण्यासाठी आपचा पाठिंबा असेल. त्या बदल्यात दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मदत करण्याची आमची अपेक्षा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.