तळेगाव स्टेशन (वार्ताहर) – कोकणचा राजा म्हणून ओळख असलेला हापूस आंबा बाजारात दाखल झाला, तसेच हापूसच्या नावाखाली इतर आंबे मिसळून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकारही वाढताना दिसत आहेत.
देवगड, रत्नागिरी भागातून तळेगाव, वडगाव, कामशेत आणि लोणावळा परिसरात आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे. त्याशिवाय कर्नाटक, केरळ, काही प्रमाणात उत्तर भारतातूनही आंबा बाजारात आला आहे. आंब्याच्या मोसमात कोकणातील हापूस आंब्याला विशेष मागणी असताना काही व्यापाऱ्यांकडून मात्र ग्राहकांची फसवणूक होताना पाहायला मिळते आहे.
फळ बाजार आवारातील
व्यापाऱ्यांकडे येत असलेल्या आंबा हा त्या त्या राज्याच्या नावासह आणि आंब्याच्या जातीसह विक्री न करता तो महाराष्ट्रीयन हापूस नावाने बाजारात विक्री होऊन ग्राहकांची फसवणूक करत असतात. आंबा विक्रीच्या हंगामात हे व्यापारी गाळा भाडेतत्त्वावर घेऊन व्यापार करत असतात.
इतर राज्यातून येणाऱ्या आंब्याचे वेष्टण काढून हा आंबा रत्नागिरी, देवगड आंब्याच्या पेट्यांमध्ये भरला जातो. हा प्रकार सर्वच व्यापारी करीत नसले तरी अनेकजण असले प्रकार करत असतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहक देखील चिंतेत आहेत.
हापूस आंबा म्हटलं, तर अनेकदा बाजारात ग्राहकांना हापूस म्हणून कर्नाटकी आंबा दिला जातो. दिसायला हुबेहूब देवगड हापूसप्रमाणे दिसणाऱ्या कर्नाटकी आंब्याचा दर कमी असल्याने नागरिकही हापूस म्हणून तो घरी घेऊन जातात. मात्र, आंब्यात कीड लागणे, गोडीला कमी असणे, चव बरोबर नसणे यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना यामुळे होते.