मूलभूत सेवा : संजय गांधी वसाहतीतील नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
शिवाजीनगर – महापालिकेचे पथदिवे आहेत, मात्र ते नेहमी बंद असतात. आमच्या भागात रस्ते आहेत, पण सर्वत्र खड्डेच आहेत. वस्तीत सांडपाणी साचत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पिण्यासाठी वेळेवर पाणी मिळत नाही. अशा एक ना अनेक समस्यांचा पाढाच संजय गांधी वसाहत आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी आघाडीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्यासमोर शनिवारी मांडल्या.
बहिरट यांच्या प्रचारार्थ स्पायसर कॉलेज परिसर, सिद्धार्थनगर, सिद्धार्थ सोसायटी, संजय गांधी वसाहत परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी बहिरट यांनी मतदारांशी संवाद साधला, तसेच त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक नीलेश निकम, श्रीकांत पाटील, कैलास गायकवाड, शिवाजी बांगर, तानाजी चोंधे, राजेंद्र भुतडा, रवी शिंदे, निवृत्ती काळापुरे, शिला भालेराव, शिला गडांकुश, पद्मा सातव, सुंदर ओव्हाळ, नूतन गायकवाड, यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.
अडचणी दूर करणार
यावेळी बहिरट यांनी मतदारांशी संवाद साधताना “गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात अनेक भागात नागरी समस्यांची सुविधा उपलब्ध झालेल्या नसल्याचे आपल्याला प्रचारादरम्यान जाणवले. ही बाब अतिशय वाईट असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांनी मला संधी दिल्यास नागरी समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपला साथ द्यावी,’ असे आवाहनही बहिरट यांनी यावेळी नागरिकांना केले.