लखनौ – पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इंडिया ही विरोधी पक्षांची आघाडी उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व ८० जागांवर विजयी होईल असा दावा समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.
समाजवादी पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. ८० जागा जिंकत भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बाहेर करायचे आहे आणि सगळ्या जागा आम्ही जिंकू असे अखिलेश म्हणाले. दरम्यान, राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणाबाबत विचारल्यावर अखिलेश म्हणाले की आमंत्रण असल्याशिवाय कोणी जात नाही. जेंव्हा बोलावले जाते तेंव्हा लोक जातात आणि माझे स्वत:चे असे मानणे आहे की स्वत: इश्वराची इच्छा असल्याखेरीज कोणी दर्शनाला जाऊ शकत नाही.
त्याची इच्छा नसेल तर कोणी त्याचे दर्शन करू शकत नाही. आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवाचे दर्शन करत असतो. जो धर्म जसा आहे त्याचा आम्ही तसाच स्विकार करतो आणि समाजवादी पार्टी सगळ्या धर्मांचा आदर करते असेही त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादावर भाष्य करताना सांगितले.
कुस्तीपटूंच्या सध्या तापलेल्या विषयावर अखिलेश म्हणाले की जे लोक महिलांच्या सन्मानाबाबत बोलतात त्यांनाच महिला पहिलवानांच्या वेदना दिसत नाहीत. त्यांच्या उत्तर प्रदेशातील सरकारने तर महिलांशी संबंधित सगळ्या योजनाही बंद केल्या आहेत. देशात महिलांवर सगळ्यांत जास्त अन्याय हा उत्तर प्रदेशात होतो आहे. महिलांबाबत सगळ्यांत जास्त भेदभावही उत्तर प्रदेशातच होतो आहे.